
सहकारमहर्षीचा जीवनपट
आप्पासाहेब मारुतराव झांजुर्णे

करमाळा तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक पटावर आपल्या कर्तृत्वाचा आणि सहकाराचा एक वेगळाच ठसा उमटवणारे नेतृत्व म्हणजे आप्पासाहेब मारुतराव झांजुर्णे. शून्य ते शिखरा पर्यंतचा त्यांचा हा प्रवास अत्यंत संघर्षमय, प्रेरणादायी आणि रंजक आहे.
बालपण आणि शैक्षणिक जडणघडण: नेतृत्वाचे पहिले पाऊल
१ जून १९५५ रोजी जन्मलेल्या आप्पासाहेबांचे प्राथमिक शिक्षण बेनवडी (ता. कर्जत) येथे झाले. पुढील शिक्षणासाठी ते कर्जतच्या जिल्हा परिषद शाळेत आणि त्यानंतर पुण्याच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये गेले. १९७२ मध्ये त्यांनी अकरावीची परीक्षा ‘डिस्टिंक्शन’ मिळवून उत्तीर्ण केली. कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेल्या आप्पासाहेबांनी मॉडर्न हायस्कूलमध्ये असतानाच महाराष्ट्रातील पहिली शालेय विद्यार्थी संघटना स्थापन करून आपल्यातील नेतृत्वगुणांची पहिली चमक दाखवली.

पुढे कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयात (Agriculture College) प्रवेश घेतल्यानंतर, शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत मदत करण्याचे मोठे सामाजिक काम त्यांनी केले. याच सेवाभावामुळे ते कॉलेजच्या चौथ्या वर्षी कृषी महाविद्यालय, कोल्हापूरचे जनरल सेक्रेटरी (GS) म्हणून निवडून आले. आप्पासाहेब स्वतः उच्चशिक्षित असल्याने त्यांना शिक्षणाचे महत्त्व ठाऊक होते. म्हणूनच त्यांनी केवळ स्वतःच्या मुलांनाच नव्हे, तर आपल्या भावा-बहिणींच्या मुलांनाही उच्चशिक्षित करण्याचा विडा उचलला. यासाठी त्यांनी १९८५ साली पुण्यात स्वतःचे घर घेतले आणि सर्व मुलांच्या उच्च शिक्षणाची उत्तम सोय केली. त्यांच्या या दूरदृष्टीमुळे सर्व मुले उच्चशिक्षित झाली आणि त्यांनी संपूर्ण झांजुर्णे परिवाराचे नाव लौकिक मोठ्या प्रमाणावर वाढवले.
*राजकारणात प्रवेश आणि ‘किंगमेकर’ची भूमिका*
शिक्षण पूर्ण करून आप्पासाहेब आपल्या रामवाडी या गावी परतले. याच काळात त्यांच्या जीवनात सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील आले. आप्पासाहेबांमधील धमक ओळखून त्यांनी त्यांना सक्रिय राजकारणात आणले आणि करमाळा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्षपद दिले.त्यानंतर सलग १६ वर्षे ते पंचायत समितीचे सदस्य होते. पद केवळ सदस्याचे असले, तरी संपूर्ण पंचायत समितीचा कारभार आप्पासाहेब आपल्या पुढाकाराने आणि जबाबदारीने हाकत असत. तालुक्यातील तरुण रक्ताला एकत्र करून त्यांनी तत्कालीन बळासाहेब जगताप यांचा पराभव केला आणि पोरेवाडी-केमचे येथील रावसाहेब पाटील यांना आमदार म्हणून निवडून आणले. येथूनच करमाळ्याच्या राजकारणात ‘किंगमेकर’ म्हणून त्यांचे वजन वाढले.
*सहकार क्षेत्रातील क्रांती आणि ‘रामवाडी’ केंद्रस्थान*
आपल्या रामवाडी गावाशेजारच्या पाच छोट्या गावांना एकत्र करून आप्पासाहेबांनी २०२१ एकरची सहकारी उपसा सिंचन योजना (Lift Irrigation) यशस्वी करून दाखवली. या एका प्रकल्पामुळे तालुक्यातील हजारो एकर जमीन सुजलाम् सुफलाम् झाली आणि आप्पासाहेबांचे राजकीय-सामाजिक वजन गगनाला भिडले.
*रामवाडी – सत्तेचे केंद्र*:
तालुक्यातील आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती की मार्केट कमिटी… कोणाला कुठे संधी द्यायची, याची सर्व राजकीय गणिते आणि गुप्त खलबते रामवाडी या छोट्याशा गावातून आप्पासाहेबांच्या उपस्थितीत ठरू लागली.





