बळीराजाच्या सन्मानार्थ युवकाने सुरू केले कृषी सेवा केंद्र
कुंभेज येथील स्वप्निल मोहितेचे क्रांतिकारी पाऊल
शिवतंत्र न्यूज


शेतकरी राजा फक्त नावालाच राजा राहिला आहे. चोहोबाजूने तो नाडला, पिळला जात आहे. कृषी क्षेत्रात तर त्याचे अपरिमित फसवणूक होत आहे. बोगस बियाणे आणि बोगस खते ,कीटकनाशके शेतकऱ्यांच्या माथी मारली जातात. शेतकऱ्याला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी खारी चा का होईना वाटा उचलण्याच्या भूमिकेतून कुंभेज तालुका करमाळा येथील स्वप्निल मोहिते या तरुणाने नुकतेच ज्योतिर्लिंग कृषी सेवा केंद्र कुंभेज फाटा येथे सुरू केले आहे.
स्वप्निल मोहन मोहिते कुंभेज येथील युवक. शिक्षण बीएससी ऍग्री पर्यंत झालेले. वडील मोहन मोहिते हे आदिनाथ सहकारी साखर कारखाना येथे गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत होते.वडीलही सिव्हिल इंजिनिअर आहेत. परंतु गेल्या पाच वर्षांपासून आदिनाथ कारखाना बंद आहे. सुमारे 13 लाख रुपये कारखान्याकडे त्यांचे येणे बाकी आहे. कारखाना बंद झाल्याने आता पुढे काय करायचे या विवंचनेत मोहिते कुटुंब होते. स्वप्नीलने एका कृषी कंपनीमध्ये नोकरी स्वीकारली. कुटुंबाला हातभार लावू लागले. वडील मोहन हे शेतजमीन मोजणीचे काम करतात. वास्तुशास्त्राचा त्यांचा दांडगा अभ्यास असल्याने ते नवीन बांधकाम करणाऱ्या व्यक्तींना आरसीसी प्लॅन, बांधकाम प्लॅन देखील तयार करून देतात. स्वप्निल सोबतच विल्यम्स व जी नाईन या कंपनीची केळी रोपे शेतकऱ्यांना पुरविण्याचे काम सुरू केले. गेली दोन वर्षे ते काम करत आहेत. शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा या रोपांच्या माध्यमातून झाला. इतर केळी रोपांपेक्षा अतिशय दर्जेदार रोपे स्वप्निल देत आहेत. हे काम करत असताना खूप शेतकऱ्यांशी त्यांचा निकटचा संबंध आला. त्यांच्याशी संवाद साधत असताना स्वप्निलच्या लक्षात आले की शेतकऱ्यांना खते, बियाणे, कीटकनाशके अवाच्या सव्वा दराने शेतकऱ्यांना विकली जात आहे. परिपूर्ण मार्गदर्शन मिळत नाही. परिणामी उत्पादन खर्च वाढत आहे.स्वप्निल यांना ही गोष्ट खटकली. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे तसेच उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे ही गोष्ट त्यांना लहानपणापासून वाटत होती. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आपले काहीतरी योगदान असले पाहिजे, या भावनेतून त्यांनी कृषी सेवा केंद्र सुरू केले तर त्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा करता येईल असा विचार त्यांच्या मनात आला.

कुंभेज फाटा येथे त्यांनी जागा पहिली. 2500 चौरस फूट एवढे शेड त्यांनी बांधून ग्रामदैवत असलेल्या श्री ज्योतिर्लिंग या दैवताच्या नावाने कृषी सेवा केंद्र त्यांनी सुरू केले.अतिशय बिकट परिस्थिती असताना देखील सुमारे वीस लाख रुपये भांडवल त्यांनी या उपक्रमासाठी उपलब्ध केले आहे. या उद्योगाची सुरुवातच मुळी शेतकऱ्यांच्या सेवेसाठी केली असल्यामुळे ना नफा ना तोटा या तत्त्वावर त्यांनी आपले दर पत्रक ठरवले आहे. जय किसान, आरसीएफ , महाधन या कंपनीची दर्जेदार खते, धनुका, बायर, टाटा कंपनीची कीटकनाशके त्यांनी विक्रीसाठी ठेवले आहेत.ऍडव्हान्टा , श्रीराम, वेस्टर्न या नामांकित कंपनीचे बियाणे देखील त्यांनी उपलब्ध करून दिले आहे. दोन महिन्यातच सुमारे 250 नियमित ग्राहक यांना मिळाले. या शेतकऱ्यांना सर्व पिकांच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंतचे मार्गदर्शन स्वप्निल देत आहेत. पिकांना आवश्यक असलेली अन्नद्रव्ये नेमक्या स्वरूपात देण्याचा प्रयत्न ते करतात.ज्यामुळे शेतकऱ्यांची खताची बचत होते.. परिणामी उत्पादन खर्च देखील वाचते. ऊस, केळीसाठी लागणारे बेसल डोस , विद्राव्य खते कमीत कमी किमतीत ,दर्जेदार खते शेतकऱ्यांना देण्यावर त्यांचा भर आहे . कुंभेज परिसरात तील बहुतेक क्षेत्र हे केळी व ऊस या पिकांचे असल्याने या पुढील काळात ते या पिकांचे परिपूर्ण मार्गदर्शन शेतकऱ्यांना करून देत विक्रमी निर्यातक्षम केळीचे उत्पादन कसे घेता येईल तसेच उसामध्ये एकरी जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल आदी बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन देणार आहेत. परिसरातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ज्योतिर्लिंग कृषी सेवा केंद्र ला भेट देऊन सेवेची संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
विल्यम्स व जी 9 या दर्जेदार केळी रोपांच्या माध्यमातून केळीचे निर्यात उत्पादन घेण्यासाठी ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत शेतकरी घेत असलेली पारंपरिक केळी रोपे व विल्यम्स जी नाईन रोपे यामध्ये काय फरक आहे असे विचारले असता ते म्हणाले की, ही रोपे अतिशय दर्जेदार असून केळी फळांची लांबी ही इतर कोणत्याही वानापेक्षा जास्त आहे. वरील फणीमध्ये केळींची संख्या 32 पेक्षा जास्त आहे. बुंध्यांची साईज मोठी असल्याने इतर वाणांपेक्षा वाऱ्यामुळे झाडे पडण्याची भीती कमी आहे. या वाहनांच्या घडाचा आकार पहिल्या फणी पासून ते शेवटच्या फनी पर्यंत एकसारखा असतो. तसेच खोडवा, निडवा सुद्धा निर्यातक्षम अशा प्रकारचे उत्पादन मिळते. हे वाण सध्या रोगांना जसे की व्हायरस पणामा, विल्ट आदी रोगांना प्रतिकारक्षम आहेत. माझ्या फायद्यासाठी मी असे कोणतेही काम करणार नाही ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे नुकसान होईल. अशी ग्वाही त्यांनी यानिमित्ताने दिली.
शेतकऱ्यांच्या सेवेचे वृत घेऊन व्यवसायात पदार्पण केलेल्या स्वप्नील मोहिते यांचा हा उपक्रम अनोखा ठरावा व शेतकऱ्यांची या माध्यमातून प्रगती व्हावी यासाठी मराठा बिझनेस फाउंडेशन परिवाराकडून त्यांच्या या उद्योगास खूप खूप शुभेच्छा.