करमाळा

गुळसडीच्या उच्चशिक्षित पाटील बंधूंनी साकारली धवलक्रांती जिद्द व संघर्षाच्या जोरावर निर्माण केला आदर्श

शिवतंत्र न्यूज

 

गुळसडीच्या उच्चशिक्षित पाटील बंधूंनी साकारली धवलक्रांती

जिद्द व संघर्षाच्या जोरावर निर्माण केला आदर्श

शिव तंत्र न्यूज 

 

      करमाळा तालुक्याच्या ग्रामीण भागात उच्च शिक्षणासाठी शहरात गेलेले बरेच तरुण शिक्षणानंतर पुन्हा गावाकडे परतताना दिसत असून गावाकडे कृषी प्रक्रिया उद्योगांमध्ये नशीब आजमावताना दिसत आहेत. गुळसडी तालुका करमाळा येथील पाटील बंधूनी दुध संकलन क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे . अफाट जिद्द व संघर्ष यांतून वाटचाल करत त्यांनी करमाळा तालुक्यात तील सर्वाधिक दूध संकलनाचा बहुमान मिळवला आहे. .

 

 

      ही यशोगाथा आहे शिवाजी व अजिंक्य या दोन बंधूंची . वडील रामचंद्र पाटील व्यवसाय शेती. 35 एकर शेती रामचंद्र पाटील पारंपरिक पद्धतीने करत होते. रामचंद्र यांचे शिक्षण बेताचे असल्याने त्यांनी आपल्या मुलांना स्वतः शेतात राबून आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले. थोरले चिरंजीव शिवाजी यांचे शिक्षण B E पर्यंत झाले. शिक्षणानंतर पुणे येथे एक वर्ष त्यांनी नोकरीही केली. मात्र नोकरीमध्ये मिळणारा मोबदला अतिशय तुटूपुंजा असल्यामुळे तसेच गावाकडे वडिलांचे वय झाल्यामुळे शेती करताना त्यांना अडचणी येत होत्या. त्यामुळे नाईलाजाने त्यांना गावाकडे यावे लागले. शिवाजी यांचे लहान बंधू अजिंक्य यांचे शिक्षण बी टेक पर्यंत झाले. अजिंक्य लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्ता व हरहुन्नरी व्यक्तिमत्व होते. शिक्षणानंतर त्यांनी रत्नाकर सहकारी बँक, एचडीएफसी बँक आदी बँकांमध्ये अकलूज, टेंभुर्णी येथे नोकरी केली. नोकरी करत असताना ग्रामीण भागातील शेतकरी , समाज याविषयी त्यांना प्रचंड आस्था होती. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे, त्यांची आर्थिक उन्नती झाली पाहिजे यासाठी आपण काहीतरी करावे असे त्यांना सारखे वाटायचे , यातूनच अजिंक्य यांनी नोकरीचा राजीनामा दिला. गावाकडे आले .दोघा बंधूंनी विचारविनिमय करून डेअरी व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. छत्रपती दूध संकलन या नावाने गुळसडी तालुका करमाळा येथे दूध संकलन केंद्र सुरू केले .सुरुवातीला फक्त 180 लिटर दूध संकलन होते. पाटील बंधूंचा स्वभाव पूर्वीपासून मनमिळावू , प्रामाणिक होता. अल्पावधीतच त्यांनी आपल्या चोख व्यवहार व गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी बघता बघता दोन वर्षात पाच हजार लिटरचा टप्पा ओलांडला. गुळसडी परिसरात छत्रपती संकलनची चर्चा व्हायला लागली. वेळेवर पगार, पशुधनासाठी सवलती, आर्थिक साहित्य उपलब्ध केल्यामुळे दूध संकलनात वाढ होऊ लागली. एस एन एफ , वजनात कधीही काटा मारला नाही. परिसरात अनेक छोटे-मोठे संकलन होते परंतु त्यांना ते ज्या ठिकाणी दूध देत होते तेथे फारशा सवलती मिळत नसायच्या . वजन काटा , एस एन एफ मध्ये काटा मारला जायचा. सदोष व्यवस्थापनामुळे दूध व्यवसायिक तणावात असायचे. यातूनच परिसरातील छोट्या मोठ्या दूध व्यवसायिकांनी पाटील बंधूंना दूध संकलन मोठ्या प्रमाणावर सुरू करण्याची विनंती केली .तसेच परिसरातील सर्व चेअरमन बांधव आपल्या पाठीशी ठाम राहतील याची ग्वाही ही दिली. परिसरातील शेतकरी बांधव दूध व्यवसायिक यांना न्याय मिळावा यासाठी पाटील बंधूंनी करमाळा येथे संकलनासाठी जागा शोधण्यास प्रारंभ केला. जागा शोधताना खूप अडचणी आल्या . परंतु त्यावर त्यांनी मात करत करमाळा येथील कमलादेवी औद्योगिक सहकारी वसाहतीत शेवटी जागा मिळाली. त्या ठिकाणी त्यांनी संकलन व शीतकरण केंद्र उभारले.
        हे संकलन केंद्र उभारण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे नेते खासदार सुभाष बापू देशमुख यांनी त्यांना सहकार्य केले. लोकमंगल सहकारी बँक सोलापूर कडून पाटील बंधूंना आर्थिक सहकार्य मिळाले .तसेच संकलन कामकाजा संदर्भात मार्गदर्शन देखील त्यांनी केले. अजिंक्य पाटील यांना बँक कामकाजाचा दांडगा अनुभव होता. याचा उपयोग संकलन केंद्र उभारणीसाठी निधी जमवताना झाला. बेकिंग क्षेत्रातील अनुभवाच्या जोरावर पाटील बंधूंनी लोकधन महिला सहकारी पतसंस्था उभारली या संस्थेच्या माध्यमातून करमाळा परिसरातील दूध उत्पादकांना गाई, म्हशी खरेदी करण्यासाठी अर्थसाह्य करण्यात येते. याचा लाभ शेकडो शेतकऱ्यांनी घेतला आहे. गुळसडी परिसरात सुरू झालेले हे छोटेसे रोपटे आज मीतिला वटवृक्षात रूपांतरित होत आहे. 12000 लिटर दूध संकलन सुरुवातीला करमाळा येथे होत होते.हा प्रवासा आज दररोज 35 हजार लिटर दूध संकलनापर्यंत पोहोचला आहे. एवढे दूध संकलन करणारी छत्रपती दुध संस्था करमाळा तालुक्यातील एकमेव संस्था बनली आहे. पाटील बंधूंनी फक्त आयते दूध उचलले नाही तर दूध उत्पादकांकडे जास्तीत जास्त गाई येण्यासाठी त्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून दिली. लोकधन पतसंस्थेच्या माध्यमातून शेकडो शेतकऱ्यांना गाईंचे वाटप केले .तसेच महाराष्ट्र शासन राबवत असलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात चा एक भव्यदिव्य कॅम्प त्यांनी आयोजित करून या माध्यमातून 10 पात्र उत्पादकांना प्रकरणे मंजूर करून दिली. भविष्य काळात हजारो दूध उत्पादकांना आर्थिक मदत उपलब्ध करून देऊन करमाळा तालुक्यात धवल क्रांती करण्याचा त्यांचा मानस आहे .


       पाटील बंधू सर्व दूध श्रीरामपूर येथील प्रभात डेअरीला देतात. ही डेअरी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे फ्रान्समधील लॅक्टेलीस ग्रुप या डेरीचे व्यवस्थापन पाहतो. या माध्यमातून दूध उत्पादकांना इतर डेअरीच्या तुलनेत सोयी सुविधा अधिक मिळतात. एक आंतरराष्ट्रीय मानांकन असलेल्या कंपनीबरोबर काम केल्यामुळे भविष्यकाळात दूध उत्पादकांना चांगला न्याय मिळेल अशी अपेक्षा पाटील बंधूंना आहे.आजही इतर डेअरी पेक्षा एक रुपया जास्त दर छत्रपती डेअरी दूध उत्पादकांना देते .प्रभात डेअरी दूध उत्पादकांना दोन लाख रुपये विमा संरक्षण देते . विविध प्रकारची जनावरांची औषधे, पशुखाद्य सवलतीच्या दरामध्ये देण्यात येते त्यामुळे दूध उत्पादकांचा फायदा होतो.
उच्च शिक्षण घेतल्याचा या व्यवसायात काय उपयोग झाला यावर अजिंक्य पाटील म्हणतात, पहिली गोष्ट डेअरीची निवड – सर्वसाधारणपणे आपल्या भागात सोनाई, नेचर डीलाईट या स्थानिक दुध डेअऱ्यांना दूध जाते परंतु मी अभ्यास करून आंतरराष्ट्रीय स्तरावर काम असलेल्या प्रभात ची निवड केली. विविध बँकांमध्ये मी काम केल्यामुळे शेतकऱ्यांना वित्तीय पुरवठा करताना फारशी अडचण आली नाही. लोकधन सारखी संस्था आम्ही उभारू शकलो. छत्रपती डेअरी उभारणी कामी लागणारे भांडवल सुद्धा आम्ही यशस्वीपणे उभारू शकलो.जर आम्ही दोघेही उच्च शिक्षित नसतो तर कदाचित एवढी झेप घेऊ घेऊ शकलो नसतो.
छत्रपती डेअरीच्या माध्यमातून पाटील बंधूंनी तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे तरुणांना संदेश देताना ते म्हणतात की तुम्ही नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे बना . आपल्या माता पित्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा.
भविष्यकाळात प्रतिदीन एक लाख लिटर दूध संकलनाचे छत्रपती परिवाराचे उद्दिष्ट आहे सुमारे 50 तरुणांना रोजगार छत्रपती परिवाराच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे.वडील रामचंद्र पाटील यांचे मार्गदर्शन बंधूंना लाभते. ग्रामीण भागातून व्यवसायास सुरुवात करणाऱ्या पाटील बंधूंचा हा नेत्रदीपक प्रवास खरोखरच प्रशंसनीय असा आहे. या प्रवासातून प्रेरणा घेऊन आपले युवक नक्कीच यशस्वी होतील.

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close